माढा तालुक्यात विक्रमी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान
प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
माढा/ प्रतिनिधी-राजेंद्र गुंड
- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा व परतीच्या मान्सूनने बुधवारी सलग 12 तासांपेक्षा जास्त जोरदार बॅटिंग केल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.ओढे,नाले,नद्या,बंधारे,तलाव तुडुंब भरून वाहत होते त्यामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांतील शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
माढा तालुक्यात अनेक वर्षांनंतर एकाच दिवशी सरासरी 107 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली तर काही जणांची वाहून गेली.सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शेतांबरोबर घरात व दुकानात जाऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काही ठिकाणी ओढे व नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.या पावसामुळे शेतकऱ्यांचा फायदा कमी व नुकसान जास्त झाले आहे त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाने त्वरित मदत करणे आवश्यक आहे.कांदा व रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या त्यामुळे तेथील मातीसह पिके वाहून गेली आहेत. ऊस ,भूईमूग,सोयाबीन,फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे जरी वास्तव असले तरी या पावसामुळे उन्हाळ्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून विहिरी व कूपनलिकेमधील पाणी वाढणार आहे.या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत तसेच काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने आणि जनावरे देखील वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळे वित्त व जिवितहानी देखील झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा