विद्युत तारांच्या घर्षणातुन ठिणग्या पडून चार एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी ........ अकोले बुद्रुक येथील घटना..
सहा ते सात लाख रु.चे नुकसान....
विजेच्या खांबावरील असलेल्या विद्युत वाहिनी तारांचे एकमेकावर घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्या मुळे खाली असलेला चार एकर ऊस जळून खाक झाला असून या शेतकऱ्यांचे अंदाजे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वृत्तांत असा की अकोले बुद्रुक तालुका माढा येथील शेतकरी प्रभाकर शत्रुघ्न परबत, अरुण कुंडलिक कोथमिरे,व उत्तम त्रिंबक ढवळे यांचा को 86032 व को 265 या जातीचा आडसाली ( लागण तारीख 15 .7.2019 ),पक्व झालेला व कारखान्याकडे गळीतास तोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या उसाच्या वरील बाजूने, पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी पासुन बसवलेले विजेचे खांब व तारा आहेत. तीन चार वर्षात या वीज वहिनींच्या तारा एवढ्या सैल झालेल्या आहेत की मोठ्याने वारा सुटला किंवा दहा-बारा पक्षी तारेवर बसले तर त्या तारा एकमेकांना घासून त्यांच्या घर्षणाने ठिणग्या पडतात. असाच प्रकार शुक्रवारी, दिनांक 20 रोजी दुपारी घडला व या तारांच्या खाली असलेल्या उसाने पेट घेतला, यावेळी थोडा वारा पण सुटला होता त्यामुळे आग भडकत पुढे गेली व या आगीमध्ये प्रभाकर परबत यांचा एक एकर ,अरुण कोथमिरे यांचा दीड एकर,व उत्तम ढवळे यांचा दीड एकर असा एकूण चार एकर ऊस जळून खाक झाला. ऊसाला आग लागलेली दिसताच 40 ते 50 तरुणांनी चोहोबाजूंनी आग विझविण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली अन्यथा सभोवतालचा किमान 40 ते 50 एकर ऊस जळून खाक झाला असता असे शेतकऱ्यांनी सांगितले.
वरवडे सब स्टेशन व मोडनिंब वीज मंडळ कार्यालयाकडे या सैल झालेल्या तारा ओढून-ताणून बसवणे विषयी ,मागील दोन ..तीन वर्षात अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या आहेत, परंतु वीज मंडळाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज ऊस जळाला व नुकसान झाले अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटना घडून दोन दिवस होत आले व वीज मंडळ कार्यालयाला कळवले असूनही त्या कार्यालयाकडील कोणताही कर्मचारी वा अधिकारी किंवा महसूल प्रशासनातील कोणीही याठिकाणी पोहोचलेले नाही. सदरचा ऊस हा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना व माळीनगर शुगर फॅक्टरी यांचेकडे गळीतासाठी नोंदणी केलेला आहे. आमचे झालेले नुकसान तातडीने शासनाकडून आम्हाला मिळावे अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा