ऊसदर नियंत्रण मंडळाच्या अशासकीय सदस्यपदी माढा तालुक्यातील दोघांची नियुक्ती
आमदार बबनराव शिंदे व दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटील यांचा समावेश
- महाराष्ट्र राज्यातील सर्व साखर कारखाने निहाय अंतिम ऊसदर ठरवण्यासाठी राज्य शासनाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य ऊस नियंत्रण मंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे पाच व शेतकरी प्रतिनिधी पाच अशा 10 अशासकीय सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे त्यामध्ये माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-चेअरमन आमदार बबनराव शिंदे व जिल्हा दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटील यांची शेतकरी प्रतिनिधी म्हणून दोघाची एकाच वेळी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊसापासून तयार होणाऱ्या कारखान्यातील साखर व उपपदार्थ यापासून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नाच्या 70:30 सूत्रावर आधारित राज्यातील सर्व साखर कारखाने निहाय अंतिम ऊसदर ठरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 2013 ला कायदा अस्तित्वात आला आहे त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.समितीमध्ये साखर कारखान्यांचे 5 व शेतकरी प्रतिनिधी 5 अशा दहा प्रशासकीय सदस्यासह अन्य सहकारी प्रतिनिधी आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न व सूचना शासन दरबारी प्रलंबित असून शेतकरी हिताच्या या सूचनांच्या प्राधान्याने अंमलबजावणी करण्यासाठी तसेच दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट कायमची शिथील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.माढा तालुक्यातून या राज्य ऊसदर नियंत्रण मंडळाच्या समितीमध्ये दोघांची एकाच वेळी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा