*ऊस वाहतूक दरवाढ संदर्भात 'जनशक्ती'ची आज साखर आयुक्तांना सोबत बैठक*
*पंढरपूर येथील ट्रॅक्टर आंदोलनानंतर निर्णय*
प्रतिनिधी/टेंभुर्णी
डिझेलचे दर, ड्रायव्हरचा पगार व ट्रॅक्टर/ट्रक च्या टायर आणि स्पेअर पार्ट च्या किमती दुपटीने वाढल्या. मात्र ऊस वाहतूक कमिशन वाढले नसल्याच्या कारणाने काल जनशक्ती संघटनेने अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरीमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. एवढ्यावरच न थांबता जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत माघार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र तहसीलदारांनी जनशक्ती संघटनेची व साखर आयुक्तांची बैठक होणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर भर पावसात सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी डिझेलचे दर प्रति लिटर साठ रुपये होते. आज ते 100 च्या घरात पोहोचले आहे. ड्रायव्हरचा पगार त्यावेळी सहा हजार होता. आज 17 हजार झालेला आहे. व स्पेअर पार्ट च्या किमती देखील भयंकर वाढल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील एकाही कारखान्याने ऊस वाहतूक कमिशनमध्ये कोणतीच दरवाढ केली नाही. शिवाय टोळी पळून गेली, कामगार पळून गेला याची सर्वस्वी जबाबदारी वाहन मालकावर देण्यात आली. त्यामुळे अनेक ट्रॅक्टर/ट्रक मालकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा विविध मागण्यांसाठी जनशक्ती संघटनेने शेकडो ट्रॅक्टर सह मोर्चा काढून पंढरी मध्ये अनोखे आंदोलन केले. यावेळी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयाच्या आवारातून जाणार नाही असा पवित्रा जनशक्ती संघटनेने घेतला. भर पावसात देखील आंदोलन आणि घोषणाबाजी सुरूच होती.
दरम्यान या विविध मागण्यांसंदर्भात जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील, वाहन मालक आणि साखर आयुक्त यांची आज दुपारी चार वाजता साखर संकुल येथे बैठक होणार असून याबाबत कोणता निर्णय होणार ? याकडे जिल्ह्यासह राज्यातील ट्रक व ट्रॅक्टर वाहन चालक तथा हार्वेस्टर मालकांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा