Breaking

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खटाव ग्रामपंचायतीची चौकशी करणार : उपाध्यक्ष प्रदिप विधाते कोरोना काळातील शोबाजी, मार्केटिंग आमची संस्कृती नाही




जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खटाव ग्रामपंचायतीची चौकशी करणार : उपाध्यक्ष प्रदिप विधाते

  कोरोना काळातील शोबाजी, मार्केटिंग आमची संस्कृती नाही

वडूज प्रतिनिधी / शरद कदम

      कोरोना महामारीत काम करत आलो आहे. लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे. तुमचे मानसिक संतुलन ढासळले आहे त्यामुळे तुम्ही कोरोनाचे भांडवल करत फक्त शोबाजी व मार्केटिंग केले. ती आमची संस्कृती नाही. तर गरजू लाभार्थ्यांचे पैसे घेणा-या भ्रष्ट ग्रामपंचायतीची चौकशी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांनी दिला.
      खटाव (ता.खटाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच बबनराव घाडगे, मुगूटराव पवार, रमेश शिंदे, किशोर डंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       उपाध्यक्ष प्रदिप विधाते म्हणाले, उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यानंतर विकासकामे करत गेलो. लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले नाही. कोरोनाचा बाऊ अन् प्रसिद्धी न करता लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले. पण काहींनी कोरोनाचे भांडवल केले. कोरोना संकटात केवळ शोबाजी, मार्केटिंग केले. खटाव मधील कोरोनाचे ४० मृत्यू आणि ७८३ कोरोनाग्रस्थ यांची जबाबदारी कोण घेणार आहे. आम्ही शासकीय योजनेतून लोकांना न्याय दिला. पण तुमच्या कोरोना सेंटर मधून ५० हजारांसाठी पेशंट पळून गेला. आमदारांनी खालच्या पातळीवर बोलणे ही खटाव ची संस्कृती नाही. यशवंतरावांचे नाव घेऊन ५ लाखांच्या कामासाठी श्रेय घेणे दुर्दैवी आहे. खटावची लिंगायत स्मशानभूमीचे काम जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून होणार आहे. मंत्रालयातून होणारे हे काम नाही. तसेच खटाव-जाखणगाव रस्त्याच्या कामासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. आपण आमदार होण्याच्या आधी हे काम पूर्ण झाले आहे. 
       केवळ आठ दिवसांत खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. यासाठी १०.५३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर खटाव-लोणी-भोसरे-आमलेवाडी रस्त्याचे काम होत आहे. 
       तर एकजण माझं घ्या माझं घ्या म्हणत पळत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १२००० रुपये येतात. पण त्यामधील २००० रुपये घेतले जातात. यातूनच चौकात युवा नेते व सदस्य यांच्यात भांडंणे झाली आहेत. नळ कनेक्शन, जाॅब कार्ड यासाठी रोजगार सेवक ५०० रुपये घेतो असा सनसनाटी आरोप उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांनी केला. आपण हुकूमशाहीचे राजकारण करता. ग्रामपंचायत व्यक्तीगत मालकीची नाही. पण तुम्हाला ते उपजिविकेचे साधन वाटत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
   यावेळी दिलीप जाधव, किरण राऊत, सतीश शिंदे व पिंपळेश्वर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मनोज देशमुख यांनी आभार मानले.


            ग्रामपंचायतीचा 'तमाशा'
काहीच काम केलं नाही..पण श्रैयवादात पडला आहे..उगाच आरोप करतंय..कागदं नाचवतंय..मग ईडी, सीबीआय चौकशी कर.. ग्रामपंचायत व्यक्तीगत नाही..पण उपजिवीतेचं साधन वाटतंय..लाभार्थ्यांचं दोन हजार हानतंय..अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालंय.. अनुभव किती, उंची किती अन् बोलतंय किती असा घणाघात उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी युवा नेत्यावर केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा