भाग्यवरदायिनी "उजनी" १०० टक्के भरले....
नियोजित १११% टक्के कडे वाटचाल सुरू......
'१०९ टक्के नंतर नदीत पाणी सोडण्याचा विचार...'
. " 42 वर्षात, १०० टक्के धरण भरण्याची 37 वी वेळ....."
सोलापूर ,पुणे व अहमदनगर जिल्ह्याची भाग्य वरदायिनी असलेले उजनी धरण मंगळवार दिनांक ५ ऑक्टोबर २१ रोजी सायंकाळी १०० टक्के भरले असून 117 टीएमसी पाणी साठा झालेला आहे. १५ ऑक्टोबर २१पर्यंत धरणात 111.19 टक्के पाणी पातळी व 123.28 टीएमसी पाणी साठा होणे नियोजित आहे. २०२१ च्या पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील चार महिन्यात एकदाही एक लाख- दोन लाख क्यूसेक्स विसर्गाने पाणी आलेले नाही, परंतु दौंड येथून 3200 क्युसेक्स ते 25-35 हजार क्यूसेक्स पर्यंत विसर्गाने पाणी आलेले आहे व अशा लहान विसर्गावरच उजनी धरणाने आज 100% ची पातळी गाठली आहे . धरणाच्या मागील 42 वर्षांच्या इतिहासातील १०० टक्के भरण्याची ही 37 वी वेळ आहे.
उजनी धरणाच्या वरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा,मुठा, पवना, इंद्रायणी आदी लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या 19 धरणांपैकी 16 धरणे शंभर टक्के भरून 'ओव्हरफ्लो' झालेली आहेत, तसेच यातील ६ ते ७ धरणांमधून जास्त झालेले एकुण सहा ते सात हजार क्युसेक्स पाणी खाली प्रवाहात सोडून देण्यात येत आहे, त्यामुळे सध्या बंडगार्डन येथील विसर्ग 5710 क्युसेक्स आहे तर दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्याने वाढ होत आहे व सध्या तो 7663 क्युसेक्स इतका आहे आणि यामध्ये प्रत्येक तासाला वाढ होत आहे .4 ऑक्टोबर पासून पुणे जिल्हा, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात चांगली पर्जन्यवृष्टी चालू आहे व यामुळे सर्व नद्यांना पूर आलेले आहेत .हे पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत आहे त्यामुळे धरणात 108 ते 109 टक्के पाणीसाठा होताच ,दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा विचार करून, धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल,अन्यथा तोपर्यंत नाही असे धरण नियंत्रण विभागाकडून कळविण्यात येत आहे. सध्या धरणात होत असलेल्या पाणीपातळीच्या वाढीकडे नियंत्रण विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा