अखेर शेत रस्त्याच्या सारोळा पॅटर्नला निधीचे बळ मिळणार
सारोळा ग्रामपंचायत सदस्य बाकले यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी.
उस्मानाबाद: संपूर्ण राज्यभर गाजलेल्या शेत रस्त्याच्या सारोळा पॅटर्न आता निधीचे बळ मिळणार आहे. राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना' राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १३ जुलै रोजी सारोळा पॅटर्नमधील सर्वच रस्त्याला विशेष निधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. अखेर मंत्रिमंडळात शेत रस्ते, पाणंद रस्ते करण्याचा निर्णय झाला असून या योजनेअंतर्गत सारोळासह परिसरातील शेत रस्त्याच्या मजबुतीकरणाचे मार्ग सुकर होणार आहे.
राज्यात शेत-पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते. पावसाळ्यातील पीके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकविण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात मोठा अडसर होतो आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या उद्दिष्टानुसार रोहयो अंतर्गत मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणे व ग्रामीण भागात सामुहिक उत्पादक मत्ता व मुलभुत सुविधा निर्माण करता येणार आहे. या योजनेमुळे सर्व शेतांपर्यत योग्य गुणवत्तेचे बारमाही वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत. प्रत्येक गावात सरासरी ५ किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. राज्यात अशा रितीने राज्यात २ लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधले जाणार आहेत. गत काही महिन्यापूर्वीच रस्त्याचा सारोळा पॅटर्न राबविण्यात आला होता. मात्र या या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण होत होती. याबाबत सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांची १३ जुलै २०२१ रोजी मंत्रालयात भेट घेऊन शेत रस्त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. यावेळी ना. पवार यांनी लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यातील शेत रस्ते व पानंद रस्ते करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून शेत रस्त्यांना निधीचे बळ मिळणार आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री शंकरराव गडाख, ग़ ओमराजे निंबाळकर, आ. कैलास घाडगे-पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी आभार मानले आहेत.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा