Breaking

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

बेंबळेच्या रूपाली निर्धार- गोरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवडः..... एका जिद्दी महिलेची अभिमानास्पद यशस्वी वाटचाल.....



बेंबळेच्या रूपाली निर्धार- गोरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवडः..... 
एका जिद्दी महिलेची अभिमानास्पद यशस्वी वाटचाल..... 



बेंबळे। मुकुंद रामदासी।          फोटो 

          बेंबळे येथील रहिवासी असलेल्या रूपाली हनुमंत निर्धार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये (एमपीएससी) राज्य पोलीस विभागांत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेली आहे. विशेष म्हणजे 8 मार्च 22  या 'महिला दिनी' दुपारी त्यांना त्यांच्या पोलिस उपनिरीक्षक निवडीचा मेसेज मिळाला व नंतर कुटुंबासहित सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही.
 सविस्तर वृत्तांत असा की रूपाली निर्धार यांचा आजपर्यंतचा जीवनपट अतिशय उल्लेखनीय व अभिमानास्पदच आहे. बेंबळे येथील शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या रुपालीताई ,येथील विमलेश्वर विद्यालयातून 2002 साली दहावीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या व टेंभुर्णी येथील कन्या प्रशाला मधून कला विभागातून बारावी परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.  मनात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवण्याची जिद्द होती परंतु घरातील वातावरण वेगळेच होते. आई-वडील आणि नातेवाईकांच्या आग्रहाखातर बारावीनंतर त्यांचा, बार्शी( धानोरे) येथील सोमनाथ अर्जुन गोरे यांच्याशी विवाह संपन्न झाला. सोमनाथ गोरे हे भारतीय लष्करात नोकरी करत होते त्यामुळे पतीसोबत बरीच वर्षे रूपाली यांना महाराष्ट्राबाहेर राहावे लागले . परंतु या काळात देखील त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्यांनी घरी अभ्यास करून  मुंबई  मुक्त विद्यापीठातून बी.ए .पदवी प्राप्त केली व पुणे मुक्त विद्यापीठातून एम. ए. (इकॉनॉमिक्स) ही व्दिपदवी मिळवली. पती लष्करी सेवेत असल्यामुळे घरामध्ये शिस्तीचे वातावरण व एकमेकाला प्रोत्साहन देणे, आधार देणे व समजून घेणे या बाबींना प्राधान्य मिळत होते, त्यामुळेच एम. ए. नंतर रूपालीताईनी (एमपीएससी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास सुरू केला. लष्करातील बावीस वर्षाच्या सेवेनंतर  पती सोमनाथ गोरे निवृत्त झाले व सर्व कुटुंबीय नवी मुंबई येथे स्थानिक झाले व आजही तेथेच राहत आहेत, त्यांना यश नावाचा एक मुलगाही आहे.
                नवी मुंबईत आल्यानंतर रूपालीताईनी एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासाकडे प्राधान्याने लक्ष दिले व 2019 च्या बँच मध्ये  लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. 2020-2021 मध्ये  कोरोना महामारीमुळे सर्वत्र गंभीर वातावरण निर्माण झाले होते, या काळात रूपालीताई व त्यांच्या कुटुंबीयांनी सासर- माहेर म्हणजेच बार्शी(धानोरे) व बेंबळे येथे वास्तव्य केले.
           विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 8 मार्च 22 या महिला दिनाच्या दिवशी रूपाली निर्धार -गोरे यांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून निवड झाल्याबद्दल ऑनलाइन मेसेज मिळाला आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले .यापुढे त्यांना नाशिक येथे ट्रेनिंग साठी जावे लागणार असून त्यानंतर कोणत्याही पोलिस स्टेशनला त्यांचे पोस्टिंग होणार होणार आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम ,उत्साह व धडाडी असल्यामुळेच कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या कृषिकन्या रूपालीताई  यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,. त्यांचा आदर्श सर्व स्तरावर प्रेरणादायी ठरतो हे मात्र निश्चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा