_महावितरणच्या विविध उपाययोजनांची फलश्रृती_
*गेल्या चार दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही*

*मुंबई, दि. २५ एप्रिल २०२२:* देशभरात कोळसा टंचाईमुळे वीज संकट निर्माण झालेले असले तरी महावितरणच्या विविध व सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे राज्यातील भारनियमन पूर्णतः आटोक्यात येत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महावितरणने सर्वच वीजवाहिन्यांवर अखंडित वीजपुरवठा केला आहे तसेच कृषिपंपांना वेळापत्रकानुसार सुरळीत वीजपुरवठा करण्यात येत आहे. अखंडित वीजपुरवठ्याची हीच परिस्थिती सोमवारी (दि. २५) देखील कायम होती, हे उल्लेखनीय.
गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे विजेच्या मागणीत अल्पशी घट झाली आहे. तरीही सद्यस्थितीत महावितरणच्या कार्यक्षेत्रात २४ हजार ते २४ हजार ४०० मेगावॅट विजेची मागणी आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणने सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणे सूक्ष्म नियोजन करून विविध स्त्रोत व वीज निर्मिती कंपन्यांकडून किती प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही क्षणाला विजेची तूट निर्माण होत असल्याची स्थिती दिसून येताच पर्यायी वीज उपलब्ध करून भारनियमन टाळण्यात महावितरणला यश येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) श्री.दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या एकत्रित प्रयत्न व पाठपुराव्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज संकटाची स्थिती लवकरच आटोक्यात आली आहे. सोबतच महानिर्मिती, अदानी, सीजीपीएल, कोयना, मौदा आदी वीज निर्मिती प्रकल्पांतून पुरेशी वीज उपलब्ध होत आहे. सोबतच मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा होत असल्याने गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करावे लागले नाही. तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याने विजेच्या मागणीत अल्पशी घट झाली आहे. विजेची मागणी कमी झाल्याने काही औष्णिक वीज संचातून वीज निर्मिती कमी करण्यात आली आहे व त्यायोगे कोळसा बचतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येत आहे.
महावितरणकडून सुरु असलेल्या सूक्ष्म नियोजनाच्या उपायांची फलश्रृती म्हणून गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या शहरी व ग्रामीण भागातील कोणत्याही वीजवाहिनीवर भारनियमन करण्यात आले नाही. तसेच शेतकऱ्यांना देखील वेळापत्रकानुसार दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने प्रत्येकी ८ तासांचा वीजपुरवठा सुरळीत आहे. सुरळीत वीजपुवरठ्याची स्थिती सोमवारी (दि. २५) कायम होती. त्यामुळे राज्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या वीज परिस्थिती अनुकूल झाली असली तरी महावितरणकडून सूक्ष्म नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हास्तरावरील वॉर रुमच्या माध्यमातून तासागणिक आढावा घेण्याचे काम २४ तास सुरु आहे. विजेची पुरेशी उपलब्धता व भार व्यवस्थापनाद्वारे कोणत्याही परिस्थितीत विजेचे भारनियमन करावे लागणार नाही यासाठी महावितरणकडून तासागणिक शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
--------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा