उचल पाण्यावरील बागायती शेतीसाठी कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे....
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे ।प्रतिनिधी। आ.बबनदादांचा फोटो
उजनी कालव्यावरून उचल पाणी घेऊन लाखो एकर बागायती शेती असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी कालव्यामधून तातडीने दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे
सविस्तर वृत्तांत असा की, सोलापूर जिल्ह्यातील माढा पंढरपूर सांगोला मंगळवेढा या तालुक्यात अद्याप समाधानकारक व सरासरी एवढा पाऊस झालेला नाही त्यामुळे उजनीच्या डाव्या व उजव्या काव्यावरून उचल पाणी घेऊन लाखो एकर बागायती असलेल्या लाभक्षेत्रातील उसासारख्या महत्त्वाचे पिकासाठी पुरेशा पाण्याची नितांत आवश्यकता आहे, सध्या पाण्याअभावी अनेक पिके निस्तेज दिसून येत आहेत, तसेच सध्या रब्बी पेरणीचा हंगाम चालू असून पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना काहीच भरोसा वाटत नाही, या भागात सर्वत्र पावसाळी ढगाळ वातावरण असले तरी अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे .
जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार बबनदादा शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की मागील पंधरा दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणामध्ये हजारो क्युसेक्सचा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत होता व त्याचप्रमाणे धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत दहा हजार क्युसेक्स पासून एक लाख क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग सातत्याने सोडण्यात येत होता व सध्याही सध्या पंचवीस ते तीस हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडणे चालूच आहे, आज पर्यंत उजनी धरणातून भीमा नदीत किमान 90 ते 95 टीएमसी पाणी सोडण्यात आले असून हे पाणी खाली वाहून गेले आहे. सध्या गुरसाळे तलाव भरणे आवश्यक आहे तसेच कालवा काठावरील अनेक ठिकाणी पंढरपूर माळशिरस व माढा तालुक्यातील उचल पाणी घेतलेल्या शेतीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असून पाणी मागणी होत आहे .कालव्यातून पाणी सोडल्यास पर्कोलेशनमुळे जमिनीतील पाण्याची पातळी सुधारण्यास निश्चित मदत होणार असून विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे. उजनीच्या कालव्यामध्ये ठिकठिकाणी काही अंतरावर एस के एफ (पाणी सोडून देण्यासाठी तयार केलेली सोय) उपलब्ध आहेत ,ज्या क्षेत्रामध्ये कालव्यातील पाणी जास्त होत असेल तेथील एस के एफ मधून पाणी खाली नदीकडे सोडून देण्यास काही हरकत येत नाही असेही आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. याबाबत आता सोलापूर जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता यांनी तातडीने निर्णय घेऊन कालव्यातून दोन हजार क्युसेक्स पाणी किमान पंढरपूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत तरी सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा