संविधान वाचवण्यासाठी संघटीत शक्ती उभी राहण्याची गरज
संविधान सुरक्षा आंदोलन अभियानास महाडमध्ये प्रारंभ
महाड – प्रतिनिधी
देशाचे संविधान वाचवण्यासाठी सर्व धर्मातील लोकांनी एकत्रित येवून संघटित शक्ती उभी करण्याची गरज असल्याचे महाड मधील संविधान सुरक्षा आंदोलन अभियानाच्या चर्चासत्रात निश्चित करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, माजी मंत्री हुसैन दलवाई, आणि राजरत्न आंबेडकर, माजी खासदार मौलाना उबेदुल्ला आझमी, हे उपस्थित होते. या संविधान सुरक्षा आंदोलनाची संकल्पना
भारताचे संविधान हे देशातील सर्व धर्म पंथ आणि घटकांना बरोबर घेत समान न्याय पद्धतीने भारतीय नागरिकाला सुरक्षा देत आले आहे. मात्र गेली कांही वर्ष भाजप बहुमताच्या जोरावर मुस्लीम, बौद्ध आणि इतर घटकांवर जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे. मुस्लीम समाजाला लक्ष करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू आणि मुस्लीम अशा प्रकारचे जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे देश वाचवण्यासाठी संविधान वाचवणे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे मत यावेळी उपस्थितानी व्यक्त केले. यावेळी प्रमुख वक्ते सुषमा अंधारे, हुसैन दलवाई, आणि राजरत्न आंबेडकर यांचे स्वागत संविधानावरील पुस्तक देवून करण्यात आले.
महाड मध्ये संविधान सुरक्षा आंदोलन अभियानाचा प्रारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे झाला. यावेळी उपस्थित असलेल्या विविध तालुक्यातील प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करताना संविधान वाचविण्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे यांनी देशात तलाक, बुरखा, एन.आर.सी. आदी प्रश्नावरून मुस्लीम समजाला लक्ष केले जात आहे. एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणायचे आणि दुसरीकडे हिंदू धर्माच्या सणांवर निर्बध लावल्याचा बोभाटा केला जात आहे. आपल्या पदांचा गैरवापर करत आणि केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी धरून प्रत्येक राज्यावर दबाव टाकला जात आहे. मूळ प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित केले जात असून देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याची भाषा केली केली जात असल्याचे सांगून नवनीत राणा यांनी ज्या पद्धतीने गणपतीचे विसर्जन केले ते हिंदू धर्माला शोभनीय आहे का असा सवाल देखील करत भविष्यात संविधान बदलाची भाषा देखील केली जावू शकते त्यामुळे संघटीत होणे काळाची गरज असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
आपल्या भाषणात हुसैन दलवाई यांनी देखील १९२५ मध्ये आर.एस एस.ची स्थापना झाली तिथपासून हे राष्ट्र हिंदूराष्ट्र बनवण्याची तयारी केली गेली. आज देखील तीच भाषा केली जात असून सध्या बहुसंख्येच्या जोरावर संविधान धोक्यात आणण्याचे काम केले जात असल्याचा आरोप हुसेन दलवाई यांनी केला. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन संविधान बचाव करण्यासाठी मोठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे. मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची जनजागृती करून शिक्षणाची टक्केवारी वाढवली पाहिजे असे सांगितले. राजरत्न आंबेडकर यांनी देखील भाजप च्या कार्यपद्धतीवर टीका करत सर्व जाती - धर्माला बरोबर घेऊन संविधान वाचवण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे असे सांगितले. देशात सध्या फंडामेंटल राइट्स राहिलेले नाही. फंडामेंटल राइट्स ऐवजी आदेश दिले जातात. आरक्षण संपवण्याचे देखील षडयंत्र या शक्तीकडून सुरू आहे याकरता संघटित होऊन संविधानाची चळवळ तळागाळापर्यंत नेणे गरजेचे असल्याचे सांगीतले. या अभियानाचे निमंत्रक हबीब फकी यांनी देखील आपले मत यावेळी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा