महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा वारसा आजच्या पिढीने जपणे आवश्यक - आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड
विठ्ठलवाडीच्या वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
माढा / प्रतिनिधी- अनेक महापुरुषांनी देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.थोर महापुरुषांचे कार्य व विचार आजच्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्यासह अनेक महापुरुषांच्या कार्याचा व विचारांचा वारसा आजच्या पिढीने जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विठ्ठलवाडीच्या वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांनी व्यक्त केले आहे.
ते विठ्ठलवाडी ता.माढा येथील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सुरुवातीला दोघांच्याही प्रतिमांचे पूजन प्रगतशील द्राक्ष बागायतदार पांडुरंग खांडेकर व शिवाजी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे होते.
याप्रसंगी बोलताना वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे म्हणाले की, प्रत्येकाने नेहमी सत्याची पाठराखण करुन वाईट विचारांचे लोक तसेच विविध प्रकारच्या वाईट व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी दर्जेदार पुस्तके व साहित्याचे वाचन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य भिमराव गुंड,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे, सौदागर गव्हाणे, सचिव नेताजी उबाळे,सतीश गुंड,कैलास सस्ते, नामदेव भुसारे,धनाजी शेंडगे,हनुमंत नागटिळक,ग्रंथपाल अमोल जाधव, रवींद्र शैंडगे,धनाजी भांगे,शिवाजी खरात यांच्यासह ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.
फोटो ओळी-विठ्ठलवाडी ता.माढा येथे गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त प्रतिमांचे पूजन करताना पांडुरंग खांडेकर व शिवाजी कोकाटे व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा