उजनी धरणातून भीमा सीना बोगद्यातून पाणी सोडण्यास प्रारंभ ....
बेंबळे ।प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी नऊ पासून उजनी धरणातून भीमा सीना जोड कालवा (बोगदा) मधून पाणी सोडण्यास प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला शंभर क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ होणार आहे व आगामी तीन दिवसाच्या आत 950 क्यूसेक्स पर्यंत पाणी सोडले जाईल अशी माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की मागील पावसाळ्यात सर्वत्र समाधानकारक आणि मुबलक भरपूर पाऊस झालेला असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची अद्याप पर्यंत शेतीसाठी आवश्यकता भासलेली नाही , परंतु सीना नदी व त्यावरील असलेले १७ बंधारे यातील पाणी सध्या कमी होऊ लागले असून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पाणी उचलून घेतले आहे त्यामुळे सीना नदीत व त्यावर असलेल्या 17 बंधाऱ्यामध्ये पाणी कमी पडू नये म्हणून गुरुवार दिनांक 21 रोजी सकाळी नऊ पासून बोगद्यातून सीना नदित पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. उजनी धरण मागील पावसाळ्यात 111 टक्के भरले होते व त्यामध्ये 123 टीएमसी पाणीसाठा झालेला होता , सध्या धरणातील पाण्याची टक्केवारी १०८ टक्के असून 121.21 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या मुबलक पाणी साठ्यातून कालवा, बोगदा व सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणीपुरवठा होणार आहे. सहा ते दहा जानेवारी 23 च्या दरम्यान सीना माढा सिंचन योजना व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचेही माने यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा