ब्लॉकमध्ये पाचपेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करताना सापडले तर पर्यवेक्षकावर कारवाई करणार .
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणार - प्राचार्य राजेंद्र ठोंबरे .
अकोले खुर्द येथे बोर्ड परीक्षा दक्षता समितीची बैठक.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारी 21 फेब्रुवारीपासून सुरू होत असून यासाठी ' कॉपीमुक्त अभियान ' राबविण्याच्या दृष्टीने दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करून यावर्षीची बारावीची परीक्षा अत्यंत कडकपणे शासनाच्या नियमानुसार राबविणार असून , विद्यार्थ्यांच्या झाडाझडतीसाठी शिक्षकांबरोबरच गावातील पोलीस पाटील व कोतवाल यांचे सहकार्य घेणार असल्याचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले .
अकोले खुर्द तालुका माढा येथील बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात दक्षता समितीची बैठक प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी पार पडली .
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील , सरपंच कांतीलाल नवले , संतोष पाटील , अनिल तोडकर , पोलीस पाटील नागेश पाटील , कोतवाल संदीप बनसोडे , माजी उपसरपंच कुबेर महाडिक , गणेश भांगे , सागर महाडिक आदी उपस्थित होते.
21 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची बोर्ड परीक्षा सुरू होत असून अकोले खुर्द तालुका माढा येथील बबनराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या परीक्षेचे केंद्र असून केंद्र क्रमांक 0 448 या केंद्रावरती बारावीचे एकूण 402 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये शिंदे विद्यालयाचे 328 व कंदर येथील कन्वमुणी विद्यालयाचे 41 तसेच स.रा.मोरे विद्यालय अकोले खुर्द येथील 33 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा ही कॉपीमुक्त , निर्भय व निकोप व शांत वातावरणात पार पाडण्यासाठी अकोले खुर्द व परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी केले आहे.
यावर्षीची बारावीची परीक्षा ही अत्यंत कडकपणे होणार असून यासाठी महसूल विभागाची बैठी पथके तयार करण्यात आली आहेत . संवेदनशील परीक्षा केंद्रावर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेले आहेत , तसेच भरारी पथके प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक नेमण्यात आले असून , जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद येथील विभाग प्रमुखांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या अचानक तपासणीसाठी पोलिसांची उपस्थिती ,झडती , व बैठे पथक तयार करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दौरे होणार असून प्रामुख्याने संवेदनशील तालुके आणि केंद्रावर लक्ष ठेवण्यात येणार आहे .
ब्लॉकमध्ये पाचपेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करताना सापडले तर पर्यवेक्षकावर कारवाई करणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी सांगितल्याचे असे प्राचार्य ठोंबरे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा