राजकारण्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजकार्याचा आदर्श घ्यावा ...... प्रा. संतोष शिंदे
बेंंबळे।प्रतीनिधी।
जात-धर्म बाजूला ठेवून समाज उपयोगी कर्तृत्वाच्या यशस्वी पाऊलखुणांची स्मृती तीनशे वर्षांपूर्वी पासून ते आज देखील प्रेरणादायी असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजकार्याचा आदर्श प्रचलित राजकीय व्यक्तींना प्रेरणादायी ठरणार आहे असे प्रतिपादन अभ्यासू प्रवक्ते प्राध्यापक संतोष शिंदे यांनी केले आहे. बेंबळे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. सरपंच विजय पवार, उपसरपंच नमिता अनपट, माजी सरपंच कैलास भोसले, गोविंद भोसले ,कल्पना भोसले, पोपट अनपट, संजय पवार, रत्नाकर कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम जेष्ठ कार्यकर्ते नारायण काळे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यसनमुक्ती संघटनेचे युवक कार्यकर्ते समाधान सलगर-पाटील यांनी प्रास्ताविक मध्ये आहिल्या मातेच्या जीवनाचा आलेख सर्वा समोर मांडला.
अहिल्यादेवींनी 250 वर्षांपूर्वी, कौटुंबिक दुःख बाजूला सरून समाजासाठी ठिकठिकाणी तीर्थक्षेत्री बांधलेले घाट, पाण्यासाठी गावोगावी तयार केलेल्या विहिरी आणि बारवा, सती प्रथेला केलेला विरोध, राज्यसत्तेचा सामाजिक उन्नतीसाठी केलेला योग्य वापर व सर्वत्र निर्माण केलेला कर्तुत्वाचा दरारा या अहिल्यामातेच्या जीवनाविषयी प्राध्यापक संतोष शिंदे यांनी सखोल विवेचन करून उपस्थितांच्या समोर इतिहासकालीन देखावेच ऊभे केले. यावेळी किशोर सलगर, समाधाना अवताडे व गोविंद भोसले यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.
याप्रसंगी माजी सरपंच कल्पना भोसले, अनुराधा शिंदे, शैला कीर्ते व छाया लोंढे या चार कर्तुत्वान महिलांना शाल, पुष्पहार, ट्रॉफी, प्रमाणपत्र व मानधन देऊन उपसरपंच नमिता अनपट यांचे हस्ते राजमाता अहिल्यादेवी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच ग्रीन व्हिलेज फाउंडेशनचे अभिजीत पवार व राज्य पोलीस मध्ये निवड झालेल्या कोमल गाडे व इतर तिघांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना माजी सरपंच प्रा. कल्पना भोसले म्हणाल्या की हा सत्कार भावी समाजकार्यास प्रेरणादायी ठरणार हे निश्चित.
चौकट.....
कार्यक्रमासाठी ग्रा.पं. महिला सदस्यांची उपस्थिती असावी... माजी सरपंच गोविंद भोसले सर
आजच्या सामाजिक व महिला गौरव कार्यक्रमास बेंबळे ग्रामपंचायतच्या बऱ्याच महिला सदस्या गैरहजर तर त्यांचे पतीराज पुढारी म्हणून सर्वत्र मिरवत होते. निदान सार्वजनिक कार्यक्रमाला तरी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पत्नी ला उपस्थित ठेवत जावा असा मोलाचा सल्ला माजी सरपंच गोविंद भोसले यांनी याप्रसंगी दिला. ग्रामीण भागात सर्वत्र असाच प्रकार दिसून येतो, 'बायको बसली खुर्चीवरी.... नवरा बनलाय कारभारी' हे चित्र सर्वत्र दिसून येते, या
बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालावे व गावातील प्रत्येक कार्यक्रमास महिला सदस्यांची उपस्थिती सक्तीची करावी असे मत अनेकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील प्राध्यापक विभीषण किर्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गणेश कोळेकर यांनी केले .या कार्यक्रमास गावातील सर्व थरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा