दिंड्या आणि वारकऱ्यामुळे बेंबळे-घोटी परिसर भक्तीमय.....
नावालाच मिनी पालखी मार्ग: शासकीय निधी नाही:
रस्ता आणि पाण्याची गंभीर समस्या ..
गावकऱ्यांचे मात्र वारकऱ्यांच्या सोयीकडे जातीने लक्ष..
बेंबळे ।प्रतिनिधी मुकुंद रामदासी आली आषाढी एकादशी। चला जाऊ पंढरीसी ।
भेटू विठ्ठल रखुमाईसी.....।।
नासिक, नगर, नेवासा, पारनेर, धुळे, जळगाव ,अकोला, अमरावती, अहमदनगर, शनिशिंगणापूर, देवगड या भागातून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील शेकडो दिंड्या व लाखो वारकरी करमाळा शहरानंतर टेंभुर्णी - परिते - करकंब या मुख्य रस्त्याने पंढरीला जातात. परंतु मागील अनेक वर्षापासून यातील किमान शंभर ते सव्वाशे दिंड्या व त्यांचे बरोबर येणारे सव्वा ते दीड लाख वारकरी जवळचा मार्ग म्हणून टेंभुर्णी- बेंबळे- घोटी- चांभार विहीर- करकंब या मार्गाचा अवलंब करतात म्हणून टेंभुर्णी ते चांभार विहीर या 18 किलोमीटर रस्त्याला मिनी पालखी मार्ग म्हणून संबोधले जाते व अनेक वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील हे मान्य केले आहे. यामुळे सध्या बेंबळे, घोटी हा परिसर दिंड्या, पताका ,वारकरी व टाळ मृदंगाच्या ध्वनीने भक्तीमय झालेला दिसून येत आहे .गावात भजन कीर्तनाचे सोहळे चालू आहेत, जोतिबा देवस्थान मंडळातर्फे वारकऱ्यांना नाष्टा चहा दिला जात आहे ,गावातील घराघरातून वारकऱ्यांना जेवण दिले जात आहे तर या गावी अनेक बागायतदार वैयक्तिकरित्या मागील वीस पंचवीस वर्षापासून संपूर्ण दिंडीची जबाबदारी घेत आहेत. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी दिंडीत 30-40 असणारे वारकरी आता 300 ते 400 पर्यंत येत आहेत, या सर्वांची भोजन व विश्रांतीची सोय वैयक्तिक कुटुंबातर्फे केली जात आहे. येथून पंढरपूर फक्त 35 किलोमीटर आहे त्यामुळे वारकरी पुरुष ,महिला, युवक, वृद्ध अतिशय खुश आणि समाधानी दिसून येतात, मात्र वारकऱ्यांना याभागात पाणी आणि रस्ता या मुख्य समस्यांना प्रवासात तोंड द्यावे लागत आहे. टेंभुर्णी- बेंबळे- घोटी - चांभार विहीर हा 18 किलोमीटर मिनी पालखी मार्ग भक्कम चांगला बनवू असे वरिष्ठ पदाधिकारी मागील दहा पंधरा वर्षांपासून म्हणतात व मोठ मोठी आश्वासने देतात पण प्रत्यक्षात अद्याप पर्यंत काही केलेले नाही. या मार्गावरील 12 ते 13 किलोमीटर रस्ता अतिशय खराब आहे, खड्ड्यांचे साम्राज्य व दूतर्फा काटेरी झाडांनी हा रस्ता वेढलेला आहे, वारकरी व त्यांचे बोरोबरील वाहनांचे यामुळे खूप हाल होत आहेत, यातच दुर्दैवाने यावर्षी या भागात अद्याप पर्यंत पाऊस नाही व कालव्यातही पाणी नाही त्यामुळे हजारो लाखो वारकऱ्यांना पाणी टंचाईला देखील तोंड द्यावे लागत आहे, परंतु या मार्गावरील घराघरातून वारकऱ्यांना पाणी, चहा व खाद्यपदार्थ नागरिक देत आहेत.
मुख्य पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना शासन वारकऱ्यांच्या सोयीसाठी लाखो रुपयांचा निधी देते परंतु मागील पाच-सहा वर्षांपासून प्रयत्न करून देखील बेंबळे आणि घोटी ग्रामपंचायतीला शासनाकडून निधी मिळत नाही . असे असले तरी बेंबळे ,घोटी ग्रामपंचायती मार्फत वारकऱ्यांची निवास, स्वच्छता, आरोग्य, त्यांच्यासाठी वीज व याबरोबरच काटकसरीने पाण्याची देखील सोय करण्यात येत आहे, वारकरी गावकऱ्यांना दूवा देऊन पंढरीकडे रवाना होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा