27 सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांनी बोलावली कालवा सल्लागार समितीची बैठक...
कालवा ,बोगदा व दोन्ही सिंचन योजनेतून पाणी सोडण्या संदर्भात होणार सकारात्मक निर्णय...
......आ. बबनदादा शिंदे
.. शेतकरी व शासनाचे 2हजार कोटी रुपये नुकसान टळले जाणार.....
बेंबळे ।प्रतिनिधी
उजनी धरणातून कालवा ,बोगदा, सीना- माढा व दहीगाव सिंचन योजनेतून पाणी सोडण्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी, 27 सप्टेंबररोजी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्याचे मान्य केले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे , याप्रसंगी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वृत्तांत असा की दिनांक 25 सप्टेंबर रोजी आमदार बबनदादा शिंदे यांनी मंत्रालयात पालकमंत्री नामदार विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य व अवर्षणग्रस्त गंभीर परिस्थिती संदर्भात निवेदन सादर केले. मागील एक महिन्यापासून आमदार बबनदादा शिंदे आणि उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनाही निवेदन देऊन , समक्ष भेटून , जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त परिस्थितीची वस्तूस्थिती सादर करून व शेतकरी तसेच शासनाचे हजारो कोटी रुपयाचे होणाऱ्या नुकसानी पासून वाचण्यासाठी उजनीच्या कालवा, बोगदा व दोन्ही सिंचन योजनेद्वारे पाणी सोडणे विषयी आग्रही मागणी केली असता त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविलेली आहे.
आज पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदार शिंदे यांनी पुन्हा नमूद केले आहे की चालू पावसाळ्यात मागील तीन महिन्यात जिल्ह्यात अतिशय कमी (फक्त ६८ मिलिमीटर) पाऊस झालेला असून उजनी जलाशयावर अवलंबून असलेल्या भीमा ,सीना नद्या ,कालवा व सिंचन योजना यांच्या काठावरील शेकडो गावांना सध्या पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे व जिल्ह्यातून पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे, तसेच आगामी तीन ते चार महिन्याच्या आत हातात येणारी लाभक्षेत्रातील लाखो एकरातील ऊस, फळबागा, चारा वैरण व काही खरिपाची पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत व यामुळे शेतकऱ्यांचे व पर्यायाने शासनाचेही हजारो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. 19 सप्टेंबर पासून सोलापूर, पंढरपूर आदी शहरांना पिण्यासाठी 5 हजार क्यूसेक्सने उजनीतून भीमेत पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे व हे पाणी आगामी तीन ते चार दिवसात (30 सप्टेंबर पर्यंत) टाकळी औंध बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर बंद होणार आहे . 19 सप्टेंबर रोजी धरणात 23 टक्के पाणीसाठा होता व तो आता कमी होऊ लागला आहे, परंतु मागील पाच ते सहा दिवसात पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उजनीत सध्या 8 हजार क्युसेक्स ने पाणी येत आहे व जलाशयात 24 टक्के पाणीसाठा झालेला असून त्यामध्ये वाढ होत आहे, परंतु उजनी विसर्ग स्रोतातील कालवा, बोगदा, सीनानदी ,सीना-माढा व दहिगाव सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील अवलंबून असलेल्या शेकडो गावातील लाखो नागरिक व पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची व चारावैरणीची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे व तसेच सहा लाख एकर क्षेत्रातील उभी पिके पाण्याअभावी जळून चाललेली आहेत व त्यामुळे संमंधीत सर्व विसर्गस्रोतातून पाण्याचे एक आवर्तन सोडल्यास किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपये होणाऱ्या नुकसानीपासून शेतकरी व शासन दोघेही बचवणार आहेत. या सर्व वस्तूस्तीथीचा विचार करून कालवा, बोगदा ,सीना-माढा व दहीगाव सिंचन योजनेतून पाणी सोडणे संदर्भातील सकारात्मक निर्णय घेणेसाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी बुधवारी 27 सप्टेंबर रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा