Breaking

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

पाण्याअभावी जळून चाललेल्या उसाचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत....शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी...आ. बबनदादा शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.. मूग व उडीद याही पिकांचे पंचनामे होऊन त्यांना 'पीक विमा' मिळावा..

*पाण्याअभावी जळून चाललेल्या उसाचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत....शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी...

आ. बबनदादा शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
.. मूग व उडीद याही पिकांचे पंचनामे होऊन त्यांना  'पीक विमा' मिळावा..

बेंबळे।प्रतिनिधी।                   फोटो 
                 सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती बाबतचा सद्यस्थितीतील वृत्तांत असा की, मागील तीन महिन्यापासून भीमा व सीना नद्या, कालवा,बोगदा, सीना-माढा व दहीगाव सिंचन योजनां च्या लाखो एकर लाभक्षेत्रात 25 मिलिमीटर देखील पाऊस झालेला नाही व 20 मे 23 पासून सलग चार महिने झाले उजनी धरणातून लाभक्षेत्रातील उसासारख्या नगदी पिकास पाणी सोडण्यात आले नसल्यामुळे हजारो एकरातील ऊस पाण्याअभावी जळून जाऊ लागला आहे, या उसाचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच शासनामार्फत सध्या कांदा ,तूर, मका व बाजरी या पाण्याअभावी जळून जाऊन नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करून त्यांना पिक विमा मिळण्यासाठी प्रस्ताव तयार होऊ लागले आहेत, परंतू याचबरोबर मूग आणि उडीद याही नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे व्हावेत व त्यांचाही पीक विमा मिळण्यासाठीच्या प्रस्तावात समावेश व्हावा अशीही आग्रही मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महसूल मंत्री, पालकमंत्री,राज्याचे प्रधान सचिव व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   

  
                    अवर्षणग्रस्त दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी धरणात 24 टक्के पाणी व 76 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, परंतु जलाशयातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर  उपसा होत असल्यामुळे व वरून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग  कमी (फक्त 625 क्युसेक्स) असल्यामुळे दररोज पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. लाखो शेतकऱ्यांची कालवा ,बोगदा, सीना माढा व दहिगाव सिंचन योजनेमधून पिण्यासाठी व शेतीसाठी एक आवर्तन सोडण्याची मागणी होऊन देखील शासनाने या गंभीर  नैसर्गिक आपत्तीचा विचार न करता पीण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचे एक आवर्तन सोडण्यास नकार दिला आहे, त्यामुळे शेतातील लाखो एकर क्षेत्रामध्ये उभी असलेली ऊस, फळबागा यासारखी नगदी पिके तसेच चारा वैरण व  कांदा, तुर, मका, बाजरी, मूग ,उडीद यासारखी खरीप पिके पाण्याअभावी जळून जाऊन लक्ष्यावधी- कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार या भीतीने शेतकरी पूर्ण धास्तावलेला आहे. यासाठी शासनाने पाण्याअभावी जळून चाललेल्या  उसाचे तातडीने युद्ध पातळीवर पंचनामे करावेत व संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच कांदा तूर मका व बाजरी या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रस्ताव चालू आहेत व त्यांना पीक विमा मिळावा म्हणून शिफारस होत आहे  परंतु याच बरोबर मूग व उडीद याही पिकांचा पंचनाम्यात समावेश व्हावा व त्यांचीही पिक विमा रक्कम संबंधित शेतकऱ्यांना मिळावी अशी रास्त मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी वरिष्ठांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा