Breaking

रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

अखेर उजनी कालव्यातून पाणी बंद...धरणात फक्त 16 टक्के पाणी....फक्त 8 टीएमसी जिवंत पाणी साठा उपलब्ध....०६ जानेवारी२४पासून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार रब्बीचे दुसरे आवर्तन अडचणीत...?


अखेर उजनी कालव्यातून पाणी बंद...
धरणात फक्त 16 टक्के पाणी....
फक्त 8 टीएमसी  जिवंत पाणी साठा उपलब्ध....
०६ जानेवारी२४पासून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार 
रब्बीचे दुसरे आवर्तन अडचणीत...?



" फेब्रुवारी 24 अखेर पासून जिल्ह्याला पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार.... "


 बेंबळे । प्रतिनिधी                      

          अखेर ०१ नोव्हेंबर 23 पासून शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी 30 डिसेंबर 23 रोजी सकाळी बंद करण्यात आले असून ०६ जानेवारी 24 पासून भीमा नदीत सोलापूर साठी पाणी सोडण्यात येणार आहे असे  जलसंपदा धरण नियंत्रण विभागाकडून  सांगण्यात येत आहे. धरणात एकूण 72 टीएमसी पाणीसाठा असून जिवंत पाणीसाठा फक्त ०८ टीएमसी शिल्लक राहिलेला आहे, जलाशयाची एकूण पातळी 492 मीटर झालेली असून 491 मीटर पासून धरण 'मायनस'(- ऊणे ) पातळीत येणार आहे .एकंदरीत 15 जानेवारी २४ पर्यंत धरणातील पाणी पातळी 'मायनस' मध्ये येत असून शेतीसाठी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन कसे व केव्हा सोडले जाणार याबाबत कालवा सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत निर्णय होणार  आहे, यामुळे कालव्याची धरणाच्या दरवाज्यावरील पाणी पातळी तसेच बोगदा, सीना माढा व दहिगाव ची पाण्याची पातळी जानेवारी अखेर संपणार असून १५ फेब्रुवारी२४  पासून भीषण पाणी टंचाईला संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला तोंड द्यावे लागणार हे स्पष्ट दिसून येत आहे .

चौकट ... तर मार्च 24 अखेर पर्यंत कालव्यातून अकरा लाख एकर शेतीला पाणी पुरले असते. .. 
   सोलापूर जिल्ह्यातील कांही लोकप्रतिनिधींनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व पालकमंत्र्यांची दिशाभूल करून हिप्परगा तलाव व कुरनूर धरणाकडे पाणी वळवणे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना भाग पाडले, त्या भागासाठी कृष्णा खोरे नि पाण्याची मंजुरी दिलेली आहे हे सत्य आहे परंतु मागील पावसाळ्यात धरणात फक्त 60 टक्के पाणीसाठा झाला होता, पाण्याची अवस्था  अतिशय क्रिटिकल असताना अशा वेळेस केवळ मुख्य कालव्यातील पाण्याची पळवा पळवी करून श्रेय लाटण्याचे काम या लोकप्रतिनिधी केल्याचे दिसून येत आहे, कारण आता आलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना फक्त समाधान आहे आगामी उन्हाळ्यात पाणी येऊ शकणार नाही, कारण भविष्य काळामध्ये धरणात पूर्ण १११ टक्के पाणीसाठा झाल्याशिवाय या भागास पाणी मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे, यावेळेस जर या लोकप्रतिनिधींनी कालव्यातील पाणी वळवण्याचा व जनतेच्या डोळ्यावर धूळफेक करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नसता तर जिल्ह्यातील कालवा लाभक्षेत्रातील अकरा लाख एकर क्षेत्राला मार्च 24  अखेर पर्यंत शेतीसाठी पाणी मिळाले  व उभ्या पिकांना जीवदान मिळाले असते हे निश्चित. 

चौकट ...

30 डिसेंबर ची उजनीची स्थिती.... 
 पाणी पातळी .......492.200 मीटर 
 एकूण साठा .......2046.91 दशलक्ष घनमीटर
      ..................72.28 टीएमसी
 उपयुक्त साठा.....244.10 दशलक्ष घनमीटर
            ...........8.16 टीएमसी
 टक्केवारी.......16.09%
 विसर्ग...
सीना माढा सिंचनयोजना...315क्युसेक्स....
दहिगाव ....१२० क्युसेक्स
 भीमा सीना बोगदा ....250 क्युसेक्स
 कालवा.......बंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा