सोलापूर शहरासाठी उजनीतून भीमा नदीत पाच हजार क्यूसेक्स विसर्ग चालू....
जानेवारीअखेर धरण 'मायनस' मध्ये येणार...
बेंबळे ।प्रतिनिधी
उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाच हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडण्यात आले असून हे पाणी किमान 14 ते 15 जानेवारी पर्यंत चालू राहणार आहे. एकूण पाच ते साडेपाच पीएमसी पाणी नदीवाटे सोडण्यात येणार असून सध्या 14 टक्के असलेले धरण आणखीन दहा दिवसांनी तीन ते चार टक्के वर येणार आहे, जानेवारी महिन्यामध्ये उजनी धरणाच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढी कमी पाण्याची पातळी यापूर्वी कधीही झालेली नाही असे समजते.
विशेष वृत्त असे की सोलापूर शहराला पिण्यासाठी औंज व चिंचपुर बंधार्या मध्ये पाणीसाठा कमी होत असल्यामुळे व 14 व 15 जानेवारी दरम्यान सोलापूरला मकर संक्रांतीच्या सणादीवशी गड्ड्याची यात्रा असल्यामुळे उजनी धरणातून पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केल्यामुळे जलसंपदा विभागाचे प्रमुखांनी नऊ ते दहा दिवस अगोदर म्हणून 5 जानेवारीपासून धरणाच्या चार मोऱ्यातून पाच हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडलेले आहे. हे पाणी पंढरपूर मंगळवेढा सांगोला व सोलापूर शहराला तसेच भीमा नदीकाठच्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी लाभदायक ठरणार आहे. भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे 14 बंधारे या पाण्यामुळे भरून ठेवावे लागतील हे निश्चित.धरणात सध्या 492 मीटर पाणी पातळी असल्यामुळे लवकरच 491 मीटरला म्हणजेच मायनस ला पाणी पातळी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, यामुळे उजनी धरणाच्या भिंतीत असलेल्या कालव्याच्या दरवाजावरील पाण्याची तळपातळी( एमडीडीएल लेवल) 488 मीटर पर्यंत योग्य दाबाने पाणी चालते, त्यामुळे धरण मायनस मध्ये आले तरी रब्बी हंगामातील शेतीसाठी कालव्याद्वारे दुसरे आवर्तन तातडीने सुरू करण्याचा विचार जलसंपदा विभाग करत आहे. सीना माढा सिंचन योजना व दहिगाव सिंचन योजना या धरण मायनस मध्ये जाताच आपोआप पाणी बंद होते, त्यामुळे या दोन्ही योजना आता धरण मायनस मध्ये गेल्यानंतर बंदच होणार आहेत. बोगद्यामधून सध्या दोनशे क्यूसेक्स पाणी प्रवाह चालू आहे या पाण्यामुळे बोगद्यावरील मोठ्या विहिरीवर शेतकऱ्यांनी बसवलेल्या अनेक मोटारीतून लाभक्षेत्राला पाणी देण्यात येते.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा