एकवेळ डॉक्टर , इंजिनियर , वकील बनला नाही तरी चालेल पण...
प्रत्येक घरात एक चारित्र्यवाण माणूस बनलाच पाहिजे - वसंत हंकारे .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
एकवेळ डॉक्टर , इंजिनिअर , वकील बनला नाही तरी चालेल पण आज प्रत्येक घरात , कुटुंबात एक चारित्र्यवान माणूस असलाच पाहिजे . जोपर्यंत तू कोण आहे हे तुला कळणार नाही तोपर्यंत तुला तुझी जाणीव होणार नाही . परिवर्तन झाल्याशिवाय माणसातील माणूसपण जाग होत नाही . तुम्ही आनंदी असाल तर कुटुंब आनंदी असते आणि कुटुंब आनंदी असेल तर राष्ट्र आनंदी असते , असे प्रतिपादन युवा व्याख्याते , समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांनी केले .
अकोले खुर्द तालुका माढा येथील बबनराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी ९ जानेवारी रोजी आयोजित व्याख्यानात वसंत हंकारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जवानसिंग रजपुत होते.
यावेळी प्राचार्य राजेंद्र ठोंबरे , चेअरमन हरिदास पाटील ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील , सरपंच कांतीलाल नवले , धनंजय मोरे , रणजीत पाटील , पंडित पाटील , गणपती फार्मसीचे सचिव डॉ . रविंद्र बेंदगुडे, विजय खटके , अरुण पाटील , पप्पू शिंदे, अंबर घाडगे, रामभाऊ घाडगे , संतोष पाटील, दशरथ पाटील, गणेश कुटे, हनुमंत पाटील, सुरेश राऊत , विजय डोके , सोमनाथ कदम , राजेंद्र केदार उपस्थित होते.
यापुढे बोलताना वसंत हंकारे म्हणाले की , गाव सुधरायचे असेल तर घरातील प्रत्येक माणूस सुधरावा लागेल आणि देश सुधरायचा असेल तर प्रत्येक गाव सुधारले पाहिजे , तुझा बाप वाघ आहे , आई वाघीण आहे , आणि त्याच वाघिणीची तू मुलगी आहे , तू एवढी स्वस्त नाही , तुझ्यासारख्या बछड्याला जन्म दिला आहे . त्यामुळे आई-वडिलांच्या कष्टाचा पांग फेडण्याची हीच वेळ आहे . आयुष्यभर बापाच्या जीवावर खाऊ लागलं तरी चालेल पण बापाला मान खाली घालावी लागेल असं वागू नको . अरे आपल्या मुलाला दोन गुण कमी मिळाले तरी चालेल पण तो मुलगा शरीराने आणि मनाने खंबीर असला पाहिजे असे प्रतिपादन वसंत हंकार यांनी केले .
प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी केले . सुत्रसंचलन मच्छिंद्र पाटील, मोनिका सुर्वे यांनी तर आभार प्रदर्शन मोनिका सुर्वे यांनी मांडले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा