Breaking

रविवार, ५ मे, २०२४

सोलापूर शहरासाठी शुक्रवारी १० मे पासून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार......धीरज साळे


सोलापूर शहरासाठी शुक्रवारी १० मे पासून उजनीतून भीमा नदीत  पाणी सोडण्यात येणार......धीरज साळे 
  


बेंबळे ...प्रतिनिधी.                      
               शुक्रवार दिनांक 10 मे 24 पासून उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे .
अधिक वृत्तांत असा की सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जिल्हाधिकारी व जलसंपदाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र देऊन कळवले आहे की सोलापूर शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या औंज आणि चिंचपूर बंधाऱ्यांमध्ये शहरासाठी  20 मे पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था व्हावी. त्यानुसार जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी जिल्हाधिकारी  यांच्याशी चर्चा करून  शुक्रवार दिनांक 10 मे पासून उजनी धरणातून 5 हजार 
क्यूसेक्स  विसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल असे कळवले आहे. उजनी धरण ते औंज बंधारा हे अंतर 232 किलोमीटर असून धरणातून सोडलेले पाणी औंज बंधाऱ्यापर्यंत  पोहोचण्यास किमान दहा ते अकरा दिवस लागतात. सध्या कडक उन्हाळा आहे व नदी प्रवाहात पाणी जिरण्याचे प्रमाण जास्त राहणार आहे. त्यामुळे धरण नियंत्रण विभागाकडून पाणी वाढवून  किमान 6 हजार क्यूसेक्स पाणी नदीत सोडावे लागणार आहे . या आवर्तना मध्ये साडेपाच ते सहा टीएमसी पाणी धरणातून सोडावे लागणार  आहे अशी माहिती धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे.
      सध्या उजनी धरणात एकूण 40.38 टीएमसी एकूण पाणीसाठा असून धरणाची टक्केवारी मायनस (- उणे)
 -४३.४६ अशी आहे. या सोडलेल्या पाण्यामधून पंढरपूर मंगळवेढा सांगोला इत्यादी शहरांना  तसेच भीमा नदी काठावर असलेल्या शेकडो गावे व वाड्यावस्त्यां वरील नागरिकांना व जनावरांना सध्याच्या ऐन उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे ही समाधानकारक बाब आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा